तो फक्त एकवीस वर्षांचा असताना पाकिस्तानी गोळ्यांनी त्याच्या शरीराची चाळण केली, तेव्हा सैनिक म्हणून देशाची सेवा करण्याच्या त्याच्या स्वप्नांची क्षणार्धात राख झाली. अनंत अडचणींचा सागर समोर उभा राहिला, पण त्याने हातपाय मारणं थांबवलं नाही. पायांमधली शक्ती त्याने बाहूंमध्ये एकवटली. मनाचा निग्रह करून पाण्यात असा सूर मारला की, हायडेलबर्गच्या जागतिक जलतरण स्पर्धेत विश्वविक्रम नोंदवून त्याने देशाला सुवर्णपदक मिळवून दिलं. ही गोष्ट इतकी विलक्षण आहे की हिंदी चित्रपटसृष्टीलाही तिची भुरळ पडली, आणि चंदू चॅम्पियनच्या रूपाने ती पडद्यावर झळकली. भारताचे पहिले पॅरालिंपिक सुवर्णपदक विजेते मुरलीकांत पेटकर यांचे जीवनचरित्र नुकतेच मराठी आणि English मध्ये प्रकाशित झाले. या पॉडकास्ट मध्ये आपण पेटकर सर आणि पुस्तकाच्या लेखिका उज्ज्वला बर्वे, दोघांशी या निमित्ताने संवाद साधला आहे. महाराष्ट्राच्या मातीत जन्म घेतलेल्या या खर्या नायकाची मूळ कहाणी, ज्याचा संपूर्ण देशाला अभिमान आहे, जरूर पाहा.


